भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, यामुळेच विविध भाषा व संस्कृती इथे अभिमानाने जोपासली जाते. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा येथे विविधता आढळते, यामुळेच येथील खाद्य संस्कृतीत विविधता आढळते.
भारतात एकूण 28 राज्य आहेत. राज्यांची ही रचना भाषेनुसार करण्यात आली आहे. प्रामुख्याने भारतीय सण हे हिंदू कालगणनेनुसार विभागले आहेत, पण हे सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने व वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात.
मुख्यता हे सण ऋतुमानावर आधारित आहेत, यामुळे ऋतू बदलले की, त्यानुसार आहारात बदल होतात.
अनुक्रमणिका
भारतीय खाद्य संस्कृतीचा इतिहास-
भारताला लाभलेल्या गौरवशाली इतिहासामुळे इथल्या संस्कृतीचे विविध पैलू पहायला मिळतात, याचाच एक भाग म्हणजे अतिथी देवो भव, म्हणूनच येथे जेवण जितक्या प्रेमाने बनवतात, तितक्याच आदराने वाढतात देखील. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे खाद्य संस्कृतीवर याचा परिणाम आढळतो.
भौगोलिक रचनेतील फरकामुळे, प्रत्येक भागात वेगवेगळी पिके घेतली जातात, म्हणूनच ज्या भागात जे पिकेल, त्याचा आहारात प्रामुख्याने समावेश होतो. भारताच्या निम्म्या सीमा भागाला समुद्रकिनारा लाभल्यामुळे सागरी खाद्यही येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. प्रामुख्याने शाकाहार व मांसाहार हे दोन भाग खाद्यसंस्कृतीमध्ये पाहायला मिळतात.
मसाले हा खाद्यपदार्थांचा अविभाज्य भाग आहे. भारतात विविध मसाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पुरातन काळापासून भारत मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात करत होता, यामुळेच असे म्हटले जाते की, सोन्याचा धूर भारतातून निघायचा. यामुळेच भारतावर सत्ता स्थापन करण्याचा मोह अनेकांना झाला, तसे प्रयत्नही झाले. काहींना यात यश आले, तर काहींना अपयश. यामुळेच अनेक भारतीय राजघराण्यांचा भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. या सर्व घडामोडींमुळे भारताच्या संस्कृतीत मोलाची भर पडली.
भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्व
भारतीय खाद्य संस्कृतीला जगभरात मानाचे स्थान आहे. भारतीय खाद्य संस्कृतीला असणाऱ्या आयुर्वेदिक पायामुळे जगभर भारतीय संस्कृतीकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. भारतात भौगोलिक विविधता आहे, यामुळे प्रत्येक भागातील वातावरणानुसार खाद्य संस्कृती बदलते तसेच ती ऋतुमानानुसार ही बदलते. या भौगोलिक रचनेत जे पीक जोमाने येते, त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
इथल्या खाद्यसंस्कृतीमध्ये प्रत्येक अन्न घटकाचा बारकाईने अभ्यास करून, दैनंदिन जीवनात समतोल व परिपूर्ण आहार मिळावा यासाठी आयुर्वेदात प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर सात्विक, राजसीक व तामसी या गुणांवर आयुर्वेदात अन्न विभागले गेले आहे. या तीन घटकांचा मनुष्याच्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम आयुर्वेदात नमूद आहे. तसेच जेवणात आवश्यक रसांचा समावेश करून, जेवणाची रंगत वाढवण्याचा अभ्यासही भारतीय खाद्य संस्कृतीत केलेला आहे.
भारतात असणाऱ्या विविध धर्मातील लोकांमुळे येथील खाद्य संस्कृती प्रामुख्याने शाकाहार व मांसाहार या दोन विभागात विभागली आहे. तसेच येथे आढळणाऱ्या विविध जाती व धर्माच्या लोकांमुळे त्यांच्या प्रथा परंपरा सण व उत्सव इत्यादीमध्येही विविधता आढळते. या विविधतेमुळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक जरी सारखे असले तरी बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, यामुळेच पदार्थांची चवही वेगळी असते.
प्राचीन काळात भारतीय खाद्य संस्कृती ही शिकार व दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून होती. पण जसा काळ बदलला तशी साधन बदलली, पद्धती बदलल्या आणि आज जगभरात भारतीय खाद्य संस्कृती एक परिपूर्ण खाद्य संस्कृती म्हणून नावारुपास आली आहे. जगभराने भारतीय खाद्य संस्कृती जितके अभिमानाने स्वीकारली, त्याचप्रमाणे जगभरातील विविध खाद्यपदार्थ भारतात चवीने खाल्ले जातात, कारण वसुधैव कुटुंबकम ही भारताची संस्कृती आहे.
पारंपारिक साधने

जातं-
पुरातन काळात धान्य दळण्यासाठी जातं वापरले जायचं. दोन गोलाकार चपटी दगड एकमेकांवर ठेवली जातात, याच्या मध्यभागी पोकळ गोल असतो, यातून धान्य हाताच्या मुठीने आत सोडले जाते. वरच्या दगडावर लाकडी खुंटा जात हलवण्यासाठी बसवला जातो.
चूल-
अन्न शिजवण्यासा मातीच्या चुलीचा वापर होतो. जळण्यासाठी लाकडं किंवा शेणी वापरल्या जातात.
भांडी-
जेवण बनवण्यासाठी पितळ किंवा मातीच्या भांड्यांचा वापर केला जाई. बनवण्यासाठी लागणारे घटक व पद्धती यावर, कोणती भांडी वापरायची हे ठरवले जाते. त्याचबरोबर कढई, रवी, उलातन, तवा यांचाही वापर होईल. जेवण वाढण्यासाठी ताटांचा वापर होई. हे ताट तांबे, पितळ किंवा माती यांपासून बनवली जाते, तसेच केळीच्या पानांचा वापरही होत असे.
खलबत्ता-
मसाले बारीक करण्यासाठी याचा उपयोग होई. हे दगडाचे बनवलेले असे.
उखळ-
मसाले बारीक करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येई.
खाण्याच्या पद्धती-
भौगोलिक व सांस्कृतिक विविधतेमुळे प्रत्येक ठिकाणची खाणपण पद्धत वेगळी आहे. प्रामुख्याने भारतात हाताने जेवले जाते.
पूर्वी जेवण करणं व वाढणं हे काम स्त्रियांचे मानलं जाई, पण आता पुरुषही यात अग्रेसर आहेत. बनवलेले जेवण आदराने आणि प्रेमाने खाऊ घालण्यात यात भारतीयांची खासियत आहे.
सण उत्सव किंवा घरगुती कार्यक्रम यासाठी पाहुण्यांना आदराने बोलवून त्यांच्यासाठी शाही मेजवानीचे बेत येथे आखले जातात. सर्वजण एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतात, तसेच जेवणानंतर पानाचा विडा द्यायची पद्धतही येथे आहे.
भारतीय खाद्य संस्कृती वर आधुनिकतेचा परिणाम
हल्ली जग खूप छोटं झालंय असं म्हणतात. दळणवळण व संभाषणाची भरपूर साधन उपलब्ध असल्यामुळे जगभरातील खाद्य संस्कृती सर्वत्र पाहायला मिळते. जगाच्या कानाकोपऱ्यातले खाद्यपदार्थ आता ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहेत.
आधुनिक संशोधनामुळे हल्ली जेवण बनवण्याच्या पद्धती, जेवण बनवण्यासाठी लागणारी साधने तसेच साठवण्यासाठीची साधने यामध्ये आधुनिकता आढळते. यामुळे वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते.
हल्लीच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे लोकांची मानसिकता बदलत आहे. कमीत कमी प्रयत्न बनणारे पदार्थ लोकांना आवडतात, पॅकेज फूड आणि रेडी टू इट यांचे प्रस्थ वाढलेलं आढळतं, पण या सगळ्याचा परिणाम अन्य पदार्थांच्या पोषक द्रव्यावर होत आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
अन्न उद्योग बाजार
हे खूप मोठे उत्पादनाचे साधन आहे. आधुनिकतेमुळे बरेच घटक बदलले आहेत. शिक्षण, पर्यटन, दवाखाणे, सण समारंभ, उत्सव व कार्यक्रम यामुळे लोकांचा प्रवास वाढलाय. म्हणूनच हॉटेलची संख्या वाढत आहे. यातून मिळणारे उत्पन्नही मुबलक आहे, यामुळेच हॉटेल इंडस्ट्रीकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. यात सर्वात मोठा वाटा पर्यटनाचा आहे. लोक जेव्हा आसपासचे प्रदेश बघायला जातात, तेव्हा तिथल्या पदार्थांची चव त्यांना घ्यायची असते ,यामुळेच स्थानिक हॉटेलची संख्या वाढत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल बरेच उपक्रम राबवतात. तसेच आपल्या भागातील पारंपारिक पदार्थांची व संस्कृतीची जपणूक करतात.
भविष्यातील संधी-
जग कितीही आधुनिकतेकडे निघाले असले, तरी भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व कायमच अधोरेखित राहील. मधल्या काळात आधुनिकतेच्या नावाखाली लोकांनी खाद्य संस्कृतीत भरपूर बदल केले, पण आरोग्यावर त्याचे जे दुष्परिणाम झाले यामुळे लोक पुन्हा एकदा पारंपारिक पदार्थांकडे वळत आहेत.
भारतीय खाद्य संस्कृतीला आयुर्वेदाचा पाय आहे म्हणूनच प्रत्येक पदार्थ हा विचारपूर्वक बनवला जातो यामुळेच पदार्थांची पोषणमूल्य व त्यांची गुणवत्ता टिकून राहते, याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर होतो, म्हणूनच भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व अबाधित राहील.
आंतरराष्ट्रीय संघटना-
काही भारतीय पदार्थ हे कायमच जगभरात आवडीने चाखले जातात. भारतातून जेव्हा हे पदार्थ निर्यात होतात तेव्हा ते वेगवेगळ्या गुणवत्ता चाचण्या पार करूनच जातात. यासाठी सरकारी पातळीवर वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत, ज्या विविध निकषांचा अभ्यास करून पदार्थांची चव टिकवतात.
पदार्थांचे नुकसान-
भारत हा विकसनशील देश आहे. लोकसंख्या ही भरपूर असल्याकारणाने, अन्नधान्याची काळजी घेणे हा येथे एक महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांमध्ये आणि छोटा उद्योजकांकडे अन्नसुरक्षा या विषयावरील अज्ञान यामुळे बऱ्याचदा नुकसान सोसावे लागते.
खूपदा बरेसचे पदार्थ वाया जातात कारण ते साठवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा व माहितीचा अभाव आहे.
वैद्यकीय दृष्टीकोन
जसं की आपण पाहिलं, संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा सांभाळ केला जातो. भौगोलिक परिस्थिती तेथील वातावरण या सगळ्यांचा अभ्यास करून, ठराविक भागातील खाद्य संस्कृतीचा उगम झाला आहे. या सर्वांना वैचारिक आणि आयुर्वेदिय पाय आहे. म्हणूनच बहुतांश भारतीय पदार्थांमध्ये वैद्यकीय महत्त्व आढळते.
अन्न साठवण्याच्या पद्धती
पारंपारिक काळापासून भारतीय पदार्थ साठवून ठेवण्याच्या काही खास पद्धती आहेत. या पद्धती वापरून जवळपास वर्षभर पदार्थ साठवले जाऊ शकतात, जसे की लोणचे, पापड, चटण्या, पीठ इत्यादी.
याच पारंपारिक पद्धतींचा वापर करून साठवलेले पदार्थ जगभरात पोहोचले आहेत. वेगवेगळी लोणची, वेगवेगळे पापड, विविध चटण्या यांच्या पद्धती जशा वेगळ्या आहेत, तशीच चवही वेगळी आहे, पण यामुळे जेवणाची चव मात्र नक्कीच वाढते.
निष्कर्ष
जसे की आपण पाहिलं, भारतीय खाद्य संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे. तसेच यांचे महत्त्वही फार आहे. सर्व घटकांचा अगदी बारकाईने अभ्यास करून ही खाद्य संस्कृती जशी एकमेकात गुंतली आहे तितक्यात ताकदीने ती जपली सुद्धा आहे. धन्यवाद.